“प्रेम हेच आपले सारतत्त्व, सत्यस्वरूप आहे. प्रेमाला जाती, धर्म, वंश किंवा राष्ट्रीयता अशासारख्या संकुचित सीमा नसतात. आपण सारेच प्रेमाच्या सूत्रात ओवलेले मणी आहोत.” – अम्मा

आज मंदिरांत जाणा-यांची संख्या बरीच वाढली आहे. परंतु त्यानुरूप चांगल्या संस्कारांतही वाढ होत आहे असे म्हणणे मात्र कठीण आहे. याचे कारण असे की आज मंदिरात आपल्या संस्कृतीचे, संस्कारांचे ज्ञान देण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही.

आपण तत्व समजून, उमजून ईश्वरभजन करायला हवे. भिन्न देवी-देवतांच्या पृथक अस्तित्वावर विश्वास न ठेवता ही सर्व भिन्न देवरूपे त्या परम ब्रह्मचैतन्याचीच विभिन्न भावरूपे वा पैलु आहेत असे मानून प्रेमपूर्वक ईश्वरभजन केले पाहिजे. ईश्वर आपल्या मनातील सा-या इच्छा, विचार जाणत असला तरी आपल्या मनातील भावना भगवंतासमोर व्यक्त करण्यात काहीही वावगे नाही. परंतु क्रमशः निष्काम भावाने ईश्वर आराधना करण्यास शिकले पाहिजे. जेव्हा भक्ती केवळ भक्तीसाठी केली जाते तेव्हा त्यातून आपल्याला सारंकाही मिळून जातं. भौतिक प्रगती व आध्यात्मिक उन्नती दोन्ही गोष्टी साधल्या जातात. केवळ निष्काम प्रेमभक्तीनेच ईश्वर साक्षात्कार संभव आहे.

आज मंदिरांत जाणा-यांची संख्या बरीच वाढली आहे. परंतु त्यानुरूप चांगल्या संस्कारांतही वाढ होत आहे असे म्हणणे मात्र कठीण आहे. याचे कारण असे की आज मंदिरात आपल्या संस्कृतीचे, संस्कारांचे ज्ञान देण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही, म्हणून लोक आज मंदिरांना केवळ आपल्या इच्छापूर्तीचे एक साधनमात्र समजतात. आज मंदिरांत जाणारे जेव्हा श्रीविग्रहासमोर दोन्ही हात जोडून डोळे मिटून उभे असतात तेव्हा त्यांच्या मनःचक्षुसमोर देवाचे नाही तर त्यांच्या इच्छांचे चित्र तरळत असते.

अम्मा असे म्हणत नाही की मनात इच्छाच असू नयेत. परंतु मनात इच्छांचीच दाटी असेल तर आपल्याला मनःशांती मिळत नाही. अनेक लोक तर एवढ्यासाठी मंदिरात जातात की त्यांना वाटते की जर त्यांनी ईश्वर भजन केले नाही, ईश्वराला संतुष्ट केले नाही तर त्यांच्या जीवनात समस्या, अडचणी येतील. आपले सर्व प्रकारे रक्षण करणारा एक ईश्वरच आहे. योग्य प्रकारच्या ईश्वर आराधनेने सर्व प्रकारच्या भयापासून मुक्तता होते. आज मंदिरातील उपासना म्हणजे तत्वज्ञान रहित केवळ अंधानुकरण आहे असे म्हटले तर त्यात काहीही अतिशयोक्ती नाही.

पित्याने मंदिराला प्रदक्षिणा घातली म्हणून मुलगाही तेच करीत आहे. मुलगा त्याच्या पित्याच्या साःया आचारांचे अनुकरण करूनच लहानचा मोठा झालेला असतो. नंतर तोच मुलगा त्याच्या मुलासह मंदिरात जातो तेव्हा जे काही आधल्या पिढीने केले होते त्याचेच पुढची पिढी अंधानुकरण चालू ठेवते. परंतु तुम्ही हे सारं का करता आहात, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर कुणीच जाणत नाहीत. दुर्दैवाची गोष्ट अशी की लोकांचे हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांना आवश्यक ते ज्ञान देण्याची व्यवस्थाही आज आपल्या मंदिरांत नाही.

एक माणूस त्याच्या घरातील देवघरात नित्यनेमाने कुलदेवतेची पूजा करीत असे. एके दिवशी पूजेची सारी तयारी करून तो पूजेला बसला असता मांजरीने नैवेद्यासाठी बाजूला ठेवलेले दूध पिऊन टाकले. दुस-या दिवशी त्या माणसाने पूजेची तयारी केल्यावर मांजरीला पकडून टोपलीखाली कोंडून ठेवले व पूजा झाल्यावर तिला मोकळे सोडले. हे खरं आहे की त्या मांजरीतही ईश्वराचा वास आहे, पण सगुण उपासनेत बाह्य शुद्धीला अत्यंत महत्व दिले जाते. कारण बाह्य शुद्धीच अखेर आपल्याला आंतरिक शुद्धीच्या दिशेने घेऊन जाते.

कालांतराने पूजेच्या आधी मांजरीला टोपलीखाली कोंडून ठेवण्याचा एक दैनंदिन प्रघातच बनून गेला. अनेक दिवस उलटले. एके दिवशी त्या माणसाचे निधन झाले. पूजेची जबाबदारी थोरल्या मुलावर येऊन पडली. पूजेच्या आधी मांजरीला टोपलीखाली डांबून ठेवण्याचा प्रघात मुलानेही अनेक दिवस पाहिला होता. म्हणून त्याने तो प्रघात तसाच पुढे चालू ठेवला. एके दिवशी पूजा सुरु करण्याआधी तो जेव्हा मांजरीला शोधू लागला तेव्हा त्याला ती मेली असल्याचे आढळून आले. परंतु त्याने वेळ वाया घालविला नाही, त्वरीत शेजा-याच्या घरी जाऊन त्यांची मांजर घेऊन आला आणि तिला टोपलीखाली डांबून पूजेला सुरुवात केली!

आपले वडील कशासाठी मांजरीला टोपलीखाली डांबून ठेवीत होते ही साधी गोष्टही मुलाने समजून घेण्याची तसदी घेतली नाही. जे पित्याने सोयीसाठी केले त्याचेच मुलाने अंधानुकरण केले. थोड्याशा जिज्ञासेने विचारपूस करण्याचीही त्याची तयारी नव्हती. आज अधिकांश लोक अशाप्रकारेच आचारांचे पालन करीत आहेत. त्या आचारांचे आंतरिक तत्त्व समजावून घेण्याची थोडीशीही तसदी ते घेत नाहीत. जे पूर्वजांनी केले होते, त्याचेच समजून उमजून न घेता अंधानुकरण करतात. आपण असे अंधानुकरण करू नये. आपण ज्या कोणत्या धर्माचे अनुयायी असू, आपल्या धर्मातील आचारांचे आंतरिक तत्त्व समजावून घेतले पाहिजे. असे केले तरच प्रचलित अनाचार संपुष्टात येतील किवा काही अनाचार असतील तर त्यांचे निवारणही करता येईल.

अध्यात्म, मंदिरातील उपासना व पूजाअर्चनेसंबंधी निहित तत्वांविषयी सर्वसामान्य जनतेला ज्ञान देण्याची व्यवस्था मंदिराशी संलग्न होऊनच असली पाहिजे. मंदिरे मानव मनात संस्कार रुजविण्याचे केन्द्र बनावेत. अशाप्रकारे धर्मजागृती केली तर आपण आपल्या संस्कृतीचा गौरवशाली वारसा पुन्हा प्राप्त करू शकतो.ॐ

मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला पूर्णपणे ईश्वरावर केन्द्रित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनातल्या मनात मंत्रजप करीत प्रदक्षिणा घालाव्यात. दर्शन झाल्यानंतर दोन्ही हात जोडून, डोळे मिटून उभे राहून एकाग्र चित्ताने गाभा-यातील देवरूप आपल्या मनःचक्षूंनी पहावे, ध्यान करावे. मंदिरात जाऊन केवळ बाह्य रूपाचे दर्शन करणे पुरेसे नाही. दररोज ईश्वरध्यानासाठी थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे. यथासंभव मंत्रजप करीत रहावे. अशाप्रकारे आपण शक्तिसंचय करु शकतो. अनेक विभक्त धारांनी वाहणारे नदीचे पाणी एकत्र केले तर त्याचा एक विशाल शक्तिशाली प्रवाह बनतो. त्या प्रवाहात अपार शक्ती असते. त्यातून वीजनिर्मितीही होऊ शकते. त्याचप्रमाणे अनेक विचारधारांनी मनाच्या शक्तीचा अपव्यय होतो. त्याला एकाच विचारावर केन्द्रित केले तर त्याची एक महान शक्ती बनेल. जर साधारण व्यक्तीची तुलना वीजेच्या एखाद्या खांबाशी केली तर तपस्वीची तुलना ट्रान्सफार्मरशी करु शकतो.

सारंकाही चैतन्यस्वरूप आहे. मंदिर उपासनेच्या माध्यमातून सर्वांमध्ये त्या चैतन्याचे दर्शन करून सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा व सर्वांची ईश्वरभावनेने सेवा करण्याचा मनोभाव प्राप्त केला पाहिजे. हा सर्वांना स्वीकार करण्याचा मनोभाव आहे.

प्रश्न – जर ईश्वर सर्वव्यापी आहे तर मग मंदिरांची काय आवश्यकता आहे?
अम्मा – सनातन धर्माचे हे वैशिष्ट्य आहे की तो प्रत्येक व्यक्तीच्या स्तरावर जाऊन त्याचा उद्धार करतो. नाना संस्कारांचे लोक असतात. सर्वांचा मानसिक स्तर एकच नसतो. म्हणून प्रत्येकाच्या संस्कारानुरूपच मार्गदर्शन केले पाहिजे. दूधपित्या तान्ह्या बाळाला मांस खाऊ घातले तर ते त्याला पचणार नाही. त्याला त्याच्या अनुरूप आहार दिला पाहिजे. काही रुग्णांना इंजेक्शनची अलर्जी असते, म्हणून त्यांना औषध गोळीच्या स्वरूपात दिले जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शारीरिक व मानसिक जडणघडणीनुसारच योग्य त्या मार्गाचा उपदेश केला पाहिजे. या तथ्याच्या आधारावरच हिंदू धर्मातील विभिन्न संप्रदायांचा उद्भव झाला आहे. सगुण उपासना, निर्गुण उपासना, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग या सा-यांचा उद्भव हाच आधार आहे. या सर्व मार्गांचे आधारभूत तथ्य नित्यानित्य वस्तुविवेकच आहे. भजन, पूजन, अर्चना या सर्वांचे लक्ष्य हेच आहे.

अंधाला ब्रेल लिपीच्या सहाय्याने शिकविले जाते; बधिरांना सांकेतिक भाषेत शिकवावे लागते. सर्वांना त्यांच्या स्तरानुसारच ज्ञान देऊन मार्गदर्शन करता येते. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या स्तरावर जाऊन, त्यांचा उद्धार करण्यासाठी मंदिरांची आवश्यकता आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही.

वायू सर्वत्र व्याप्त आहे, परंतु पंख्याजवळ बसल्यावर सुखद वाटते ना? वृक्षाच्या सावलीत एक विशेष शीतलता असते जी अन्य स्थळी आढळून येत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या उपाधीच्या माध्यमातून ईश्वराची पूजा केली जाते, तेव्हा ईश्वराचं सान्निध्य अधिक तीव्रतेने अनुभवास येते. सूर्यप्रकाश सर्वत्र आहे, परंतु बंद खोलीत प्रकाश मिळण्यासाठी दिवा पेटवावा लागतो. गाईमध्ये दूध आहे परंतु तिचा कान पिळल्याने ते दूध मिळणार नाही. दूध तर आंचळातूनच मिळेल. ईश्वर सर्वव्यापी असला तरी मंदिरातील मूर्तीवर विश्वास ठेवणा-यांना सहजतेने त्याची उपस्थिती जाणवते. परंतु त्यासाठी विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. विश्वासाचा अर्थ आहे मनाचे ट्यूनिग, किवा मनाला ईश्वराशी जोडणे. मंदिरात ईश्वराची उपस्थिती असली तरी अविश्वासी लोकांना त्याची अनुभूती होणार नाही. विश्वासामुळेच अनुभूती होते.

एकदा अम्मा व आश्रमवासी नृत्याचा कार्यक्रम पाहत होते. एक विदेशी जोडपे विदेशी नृत्य करीत होते. त्यांचे हातात हात घेऊन नृत्य करणे एका मुलीला आवडल नाही. ती मुलगी बोलली, “छीः! हे कसले घाणेरडे नृत्य आहे, स्त्री-पुरुष एकसाथ नृत्य करताहेत!“ यावर अम्माने तिला म्हटले, “जर शिव-पार्वतीने असे एकसाथ नृत्य केले तर ते पाहून तुला लाज वाटेल का?

आपण शिवपार्वतीला दिव्य मानतो म्हणून आपल्याला त्यांच्यात काहीही वाईट दिसणार नाही. आपण जेव्हा ‘शिवपार्वती’ म्हणतो तेव्हा त्यात एक दिव्यत्व येते. म्हणून आपण त्यांना श्रेष्ठ मानतो. हे सारं विश्वासावरच अवलंबून आहे. आपण इतर स्त्रीपुरुषांत दिव्यत्व पाहू शकत नाही, म्हणून त्यांचे नृत्य आपल्याला घाणेरडे वाटते. अर्थात, आपला मनोभावच मुख्य आहे. विश्वासात दृढ प्रतिष्ठित होऊन आपण प्रयत्न केले तर निश्चितच आपल्याला ईश्वरदर्शन होईल, विश्वासच मुख्य पाया आहे.

ज्या मंदिरात वा प्रार्थनास्थळात अनेक लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात तेथील वातावरण इतर स्थळांतील वातावरणाहून वेगळे असते. दारुचा गुत्ता व ऑफिसचे वातावरण एकसारखे नसते. तसेच मंदिराचे वातावरण व दारुच्या गुत्याचे वातावरण परस्परांहून पूर्णतः भिन्न असते. लोक दारुच्या दुकानात मनोबळ गमावून बसतात. याउलट मंदिरात मनोबळ वाढते, मनोबळाचा विकास होतो. मंदिरे, प्रार्थनास्थळे सद्तरंगाने संपृक्त असतात. त्या वातावरणात विचलीत मनालाही शांतीचा अनुभव येतो. अत्तराच्या कारखान्यात एक वैशिष्ट्य असते, तेथील वातावरण सुगंधी असते. याउलट इतर रसायने बनविणाःया कारखान्यांचे वातावरण अत्तराच्या कारखान्याहून भिन्न असते. मंदिराचे भक्तिभावाने भरलेले वातावरण, तेथील पावन दृश्य या साःया गोष्टी मनाची एकाग्रता साधण्यास, आपल्यात भक्तिभाव जागविण्यास सहाय्यक ठरतात. मंदिर आरशासारखे असते. स्वच्छ आरशात आपण आपल्या चेहःयावरील घाण स्पष्ट पाहू शकतो व ती साफही करू शकतो. त्याचप्रमाणे आपली आंतरिक अशुद्धी निवारण करण्यासाठी मंदिरे सहाय्यक ठरतात.

ईश्वर आराधनेची पहिली पायरी आहे- मंदिरोपासना. देवाची उपासना करण्यासाठी व त्याच्याशी व्यक्तिगत संबंध स्थापित करण्यासाठी मंदिरे व तेथील देवविग्रह यांचे सहाय्य होते. परंतु आपण क्रमशः सर्वत्र ईश्वरीय चैतन्याचे दर्शन करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. मंदिरात योग्य मनोभावाने उपासना करूनच हे शक्य होईल. हाच मंदिर उपासनेचा उद्देश आहे.

आपण मुलांना बालपणी पक्ष्यांची चित्रे दाखवून शिकवितो. पोपट मैनेचे चित्र दाखवून त्यांना शिकवितो की हा पोपट आणि ही मैना आहे. मोठे झाल्यावर ते पोपट व मैनेतील फरक सहज ओळखू शकतात, त्यासाठी त्यांना चित्रांची गरज पडत नाही. परंतु प्रारंभी मात्र त्यांची जरुरी असते. वस्तुतः सर्वकाही ईश्वरच आहे. या अर्थाने काहीही नाकारता येणार नाही. घरात वरच्या मजल्यावर जाणारा जिना व गच्ची दोन्ही त्याच दगड-वाळू व सीमेंटने बनलेले असते. परंतु आपल्याला वर चढण्यासाठी जिन्याची जरुरी पडते. मंदिरांचेही हेच प्रयोजन आहे.

असे म्हणतात की मंदिरात जन्म घेऊ शकतो परंतु तिथेच मरता कामा नये. ईश्वराचा शोध घेण्यासाठी मंदिराचा एक उपाधी म्हणून उपयोग करू शकतो. परंतु त्यातच गुरफुटून राहू नये. सर्व बंधनातून मुक्त झाल्यावरच आपण मुक्त होतो. ईश्वर फक्त मंदिरातच आहे अशी अवधारणा कधीच बनवून घेऊ नये.

सारंकाही चैतन्यस्वरूप आहे. मंदिर उपासनेच्या माध्यमातून सर्वांमध्ये त्या चैतन्याचे दर्शन करून सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा व सर्वांची ईश्वरभावनेने सेवा करण्याचा मनोभाव प्राप्त केला पाहिजे. हा सर्वांना स्वीकार करण्याचा मनोभाव आहे.

तुम्ही आणि तुमच्या दाहिदिशांना पसरलेले हे विश्व, हे सारं ईश्वरीय चैतन्याने ओतप्रोत आहे. सर्वांमध्ये एकत्वाचे दर्शन करून स्वतःमधेच सर्वांना पाहण्याचा मनोभाव विकसित केला पाहिजे. आपण जेव्हा सर्वांमध्ये ईश्वराचे दर्शन करू तेव्हा मग आपण तिरस्कार करायचा ठरविला तर कुणाचा करू? मंदिरातील उपासना व त्यासंबंधित आचारविचार या सर्वांचे लक्ष्य व्यक्तीला या स्तरापर्यंत उन्नत करणे हेच आहे. सागर व त्याच्या लाटा पाहताना भले भिन्न वाटतील परंतु ते दोन्हीही पाणीच आहे. कंठहार, कंकण, अंगठी, पैंजण – हे सारे अलंकार भिन्न भिन्न दिसतील. हे अलंकार शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर धारण केले जातात. परंतु मूलतः ते सारे सोनेच असत. आपण जेव्हा सुवर्णाच्या दृष्टीने पाहतो तेव्हा सारे एकच आहे, त्यांच्यात काहीच भेद नाही. परंतु आपण जेव्हा त्यांचा बाह्य आकार पाहतो तेव्हा ते भिन्न वाटतात. याचप्रमाणे आपल्याला सारे लोक बाह्य रूपाने भिन्नभिन्न प्रतीत होतात, परंतु तत्त्वतः सारंकाही एकमेव परब्रह्मच आहे. केवळ तेच एकमेव ब्रह्मचैतन्य सर्वत्र विराजमान आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती घेणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य आहे. या अनुभूती बरोबरच व्यक्तीच्या सा-या समस्यांचा अंत होतो, जसे सूर्योदय झाल्यावर अंधःकार दूर होतो. आज आधुनिक शास्त्रज्ञही म्हणतात की सारी उर्जेचीच भिन्न रूपे आहेत. ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूर्वी आपल्या अनुभवाच्या आधारे एक पाऊल पुढे टाकून घोषणा केली की सारंकाही चैतन्यस्वरूप आहे- ‘सर्वं ब्रह्ममयम्’।

जर या सत्याची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला ‘ईश्वर केवळ मंदिरातील मूर्तीपुरताच सीमित आहे या विश्वासाचे उल्लंघन करावे लागेल. सर्वांमध्ये त्या चैतन्याचे दर्शन केले पाहिजे. त्यासाठी तत्त्व समजून मंदिरोपासना करायला हवी. खरेतर आपल्या अंतरात वास करणा-या आत्मचैतन्याचीच आपण उपासना केली पाहिजे. परंतु सर्वसामान्य लोकांसाठी हे कठीण आहे म्हणून ज्याप्रमाणे आरशात प्रतिबिब पाहतो तसे आपण हे आत्मचैतन्य मंदिरातील देवविग्रहात पाहून त्याची उपासना करतो. मंदिर उपासनेच्या माध्यमातून आपण आपल्या अंतरात मंदिर निर्माण केले पाहिजे. मग आपण सर्वत्र ईश्वरदर्शन करू शकू. हे मंदिर उपासनेचे आधारभूत लक्ष्य असले पाहिजे.

आपण मंदिराच्या गाभा-यासमोर देवविग्रहाचे दर्शन केल्यानंतर डोळे बंद करतो. यावरून याच तत्त्वाचा बोध होतो. बाहेर ज्या ईश्वररूपाचे दर्शन केले तेच रूप डोळे बंद करून आपल्या हृदयांतही पाहणे, मग त्यानंतर डोळे उघडून सर्वांमध्ये तो ईश्वर पाहणे. अशाप्रकारे नामरूपाच्या पार जाऊन सर्वव्यापी आत्मचैतन्याचा साक्षात्कार करू शकू.

अनेकांसाठी ईश्वर आराधना एक अंशकालीन, पार्टटाईम कार्य असते, आपल्याला अशा पार्टटाईम भक्तीची नव्हे तर पूर्णकालीन भक्तीची आवश्यकता आहे. एखाद्या लौकिक इच्छेच्या पूर्तीसाठी केली जाणारी पूजा, प्रार्थना पार्टटाईम भक्ती प्रकारात मोडते. परंतु आपल्याला आवश्यकता आहे ती केवळ भक्तीसाठी भक्तीची. केवळ ईश्वर प्रेमाचीच इच्छा बाळगून त्यासाठीच प्रार्थना केली पाहिजे, सदैव ईश्वरस्मरण केले पाहिजे. सर्वांमध्ये ईश्वर पाहिला पाहिजे. आपल्याला प्रार्थना करण्याची शक्तीही ईश्वरच देतो. जर परमात्म्याची शक्ती नसेल तर आपण साधा आपला हातही हलवू शकणार नाही. सारंकाही ईश्वरच करीत आहे हा बोध निरंतर जागृत ठेवणे हीच पूर्णकालीन भक्ती होय. या बोधाच्या माध्यमातूनच आपण शरीर मनोबुद्धीत अधिष्ठित ‘मी’पणाचा भाव सोडून सर्वव्यापी चैतन्य बनू शकतो.

कालिदासाची एक कथा आहे. त्याने मंदिरात प्रवेश करून आंतून दरवाजा बंद केला. देवीने येऊन दार ठोठावले. परंतु त्याने दार उघडले नाही. देवीने विचारले, ‘आत कोण आहे?’ लगेच आतून एक प्रतिप्रश्न विचारला गेला, ‘बाहेर कोण आहे?’ देवीने उत्तर दिले, ‘बाहेर काली आहे.’ यावर आतून पहिल्या प्रश्नाचे उत्तर आले, ‘आंत दास आहे.’ देवीने प्रश्न विचारूनही त्याने मी अमूक व्यक्ती आहे असे म्हटले नाही, आपले नाव सांगितले नाही. बाहेर काली आहे असे सांगितल्यावर आत ‘दास’ आहे असे उत्तर दिले आणि त्याच क्षणी त्याला देवीचे पूर्ण दर्शन मिळाले.

‘मी’ चा अंत झाला की केवळ तूच शिल्लक उरतो. ‘मी’पणाशी संबंधित संकुचित व्यक्तित्व नष्ट होते. केवल भगवद् इच्छाच बाकी उरते. कर्ता करविता तो एक परमात्माच आहे, हा बोध निरंतर जागृत ठेवणे हीच यथार्थ भक्ती आहे. अशा भक्तीने सारंकाही मिळून जाते, काहीही अप्राप्य उरत नाही.

भगवंताला आपल्याकडून काहीही नको आहे. आपण भगवंताला धूपदीप अर्पण करतो. या गोष्टी भगवंताला हव्यात म्हणून आपण त्याला त्या अर्पण करीत नाहीत. खरंतर आपल्या डोळ्यांची ज्योतीही ईश्वरप्रदत्त आहे. असे असताना दोनचार रुपयांच्या आपल्या दिव्याच्या ज्योतीची त्या भगवंताला काय आवश्यकता? परंतु ईश्वराचा आश्रय घेतला तर त्यात आपलाच लाभ आहे. आपण देवाला जे काही अर्पण करतो, ते आपल्या समर्पणाचे प्रतीक असते. अशा रीतीने आपल्यात समर्पणभाव विकसित होतो. एवढेच नाही तर तेला-तुपाच्या दिव्यातून निघणारा धूर वातावरणाचीही शुद्धी करतो. याउलट आपल्या कार्य सिद्धीसाठी देवाला काही अर्पण करुन त्याला आमिष दाखवित आहोत, लाच देत आहोत अशा भावनेने पाहू नये.

बीज कितीही उत्तम असले पण ते जर हातातच राहिले तर ते अंकुरित होणार नाही. मातीत लावल्यावरच ते अंकुरित होईल. असा समर्पणभाव जागल्यावरच फलप्राप्ती होईल. याचप्रमाणे ‘मी आणि माझ्या इच्छांची पूर्ती’ हा मनोभाव सोडून देऊन सारंकाही भगवंताचेच आहे, त्याच्या इच्छेनुसार सारंकाही होवो या मनोभावाचा विकास झाला पाहिजे. अशा समर्पणभावानेच भक्ती परिपूर्ण होईल.

माझ्या मुलांनो, मन अशी एखादी वस्तू नाही की जी आपण उचलून देवाला अर्पण करुन टाकावी! म्हणून मन ज्या कोणत्या विषयवस्तूंत अडकले आहे, तिच समर्पण मनाच्या समर्पणाचे प्रतीक मानले जाते.

समर्पण म्हटल्यावर काही लोकांना वाटेल की ईश्वराला काही अर्पण केल्यावरच फलप्राप्ती होईल. आपण समर्पणाचा अर्थ अशाप्रकारे लावू नये. आपण सारे मनोबुद्धीच्या स्तरावरच आहोत. मी शरीर आहे, मी अमुक व्यक्ती आहे, मी अमुक व्यक्तीचा पुत्र आहे, माझं नाव अमुक आहे. अशाप्रकारे आपण या ‘मी’ बरोबर ज्या काही उपाधी जोडून ठेवल्या आहेत त्या सर्वांचा त्याग घडला पाहिजे. अहंकार! केवळ हीच एक आपली सृष्टी आहे. त्याचाच परिपूर्ण त्याग करायचा आहे. त्याचेच भगवंताला समर्पण करायचे आहे. त्याचे समर्पण केल्यानंतर जे काही शेष राहील ती ईश्वरसृष्टीच असेल. त्यानंतर आपण भगवंताच्या ओठांवरील मुरली बनून जाऊ. नाद उद्घोष करणारा शंख बनून जाऊ. त्यासाठी आपल्या व्यक्तित्वाचा त्याग करणे पर्याप्त आहे. ‘मी’ आणि ‘माझे’पणाचा त्याग केल्यावर व्यक्तीत्व उरत नाही, फक्त सर्वव्यापी चैतन्यच उरते. ज्याप्रमाणे बीज हातात ठेवल्याने ते अंकुरित होत नाही, खडकावर टाकल्यावरही ते अंकुरित होत नाही. ते मातीतच पेरले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही कर्माचे उचित फळ मिळण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. समर्पणभावाचे जागरण झाले की भगवंताच्या कृपेने सारंकाही स्वयमेव सिद्ध होते. भगवद्चरणी आपण आपल्या मनाचे समर्पण केले पाहिजे.

माझ्या मुलांनो, मन अशी एखादी वस्तू नाही की जी आपण उचलून देवाला अर्पण करुन टाकावी! म्हणून मन ज्या कोणत्या विषयवस्तूंत अडकले आहे, तिच समर्पण मनाच्या समर्पणाचे प्रतीक मानले जाते. काही लोकांना खीर खूप आवडते. म्हणून ते देवाला खीरीचा नैवेद्य दाखवितात आणि ती खीर जेव्हा काही गरीबांना प्रसाद म्हणून वाटली जाते तेव्हा तिचे प्रयोजन सार्थक होते. मानवाचे मन संपत्तीशी सर्वाधिक आसक्त आहे. त्या आसक्तीपासून मुक्ती मिळविण्यासाठी देवाला पैसे अर्पण केले जातात.

आपण मंदिरात जाऊन पुष्पांजलि अर्पण करतो. वस्तुतः ईश्वरचरणी आपले हृदयपुष्प अर्पण केले पाहिजे. जेव्हा आपण आपले मन ईश्वरचरणी अर्पण करतो तेव्हा तीच भक्ती होते व तेच वास्तविक समर्पण होते. परंतु त्या मनाचे प्रतीक म्हणून आपण पुष्प अर्पण करतो. जर मन दुःखभाराने पीडित असेल तर आपल्या दुःखांचे भगवंतासमोर निवेदन करण्यात काही चूक नाही. आपण आपल्या अंतरीचे दुःख भगवंताला सांगून त्याला आपल्या दुःखात वाटेकरी करुन आपले दुःख त्याच्या समोर हलके करु शकतो. परंतु आपली प्रार्थना भक्तीसाठी असली पाहिजे. केवळ त्यातूनच पूर्ण फल प्राप्ती होईल. तथापि आपण असे समजू नये की देवाला सारंकाही तपशीलवार सांगितले तरच त्याला समजेल.

वकील व डॉक्टरला सारंकाही मनमोकळेपणाने सांगितले तरच ते आपली समस्या चांगल्या प्रकारे समजू शकतील व त्यावर योग्य निदान करु शकतील. परंतु ईश्वराला काही सांगितले नाही तरी तो सारंकाही जाणतो. कारण ईश्वर सर्वज्ञ व सर्वान्तर्यामी आहे. ईश्वरप्रेमाची प्राप्ती व्हावी यासाठीच प्रार्थना केली पाहिजे. जेव्हा आपली प्रार्थना केवळ ईश्वरासाठीच असते तेव्हा न सांगताही ईश्वर आपल्या गरजांची पूर्ती करतो, आपला योगक्षेम वाहतो. आपण ईश्वराशी एकरूप होण्याची प्रार्थना केली पाहिजे. अशी प्रार्थना केली तर भगवंताची कृपा सहजतेने आपल्याकडे प्रवाहित होईल आणि आपण ईश्वरीय गुणांनी संपन्न होऊ.