हिंदू धर्म सर्वांमध्ये दिव्यत्व पाहतो. समस्त चराचराला ईश्वराचे साक्षात रूप मानतो. हिंदू धर्माच्या दृष्टीने मानव व ईश्वर दोन नाहीत, ते भिन्न नसून एकच आहे. सर्व भूतमात्रांत ते दिव्य चैतन्य व्याप्त आहे. हिंदू धर्म आपल्याला शिकवितो की स्वप्रयत्नाने कोणीही अंतस्थ दिव्यत्वाची अनुभूती करून नराचा नारायण बनू शकतो. सृष्टी व स्रष्टा भिन्न नसून ईश्वर स्वतःच सृष्टीचे रूप धारण करतो, या अद्वैत सत्याची अनुभूती घेणे, सत्याचा साक्षात्कार करणे, हेच जीवनाचे परम लक्ष्य आहे असे हिंदू धर्म मानतो.

स्वप्न हे, ते स्वप्न पाहणा-या व्यक्तीहून भिन्न नसते. परंतु स्वप्न हे वास्तव नसून स्वप्न आहे हे जाणण्यासाठी त्या व्यक्तीला जागे व्हावे लागते. खरंतर सर्वकाही ईश्वरच आहे, परंतु आपण सर्वांमध्ये ईश्वराला पाहू शकत नाही. आपण दृष्टिगोचर वस्तूंमध्ये नानात्व पाहतो. काही गोष्टी व व्यक्तींप्रति राग व काहींप्रति द्वेषाचा अनुभव करतो. परिणामतः सुख व दुःख हे आपल्या जीवनाचा स्वभाव बनतो. परंतु आपण जेव्हा आपल्या सत्य स्वरूपाप्रति जागरूक होतो तेव्हा तेथे ‘मी’ आणि ‘तू’ हा भेद उरत नाही. आपल्याला अनुभूती होते की सारंकाही ईश्वरस्वरूपच आहे. त्यानंतर मग केवळ आनंदच उरतो. या लक्ष्यप्राप्तीसाठी प्रत्येकाच्या भिन्न भिन्न संस्काराला अनुसरुन हिंदूधर्मात अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. साधनामार्ग, आचार व अनुष्ठांनाच्या बाबतीत इतकी विपुलता दुस-या कोणत्याही धर्मांत आढळून येत नाही.

आपण मातीला घोडा, गाढव, उंदीर, सिंह इत्यादी अनेक आकार देऊ शकतो. नामरूपानुसार भिन्न असूनही वस्तुतः ती मातीच असते. आवश्यकता आहे ती केवळ त्या नामरूपातही मातीच पाहण्याच्या क्षमतेची. त्यासाठी नाम-रूपाच्या आधारावर प्रपंचात नानात्व पाहणारी आपली दृष्टी बदलावी लागते. वस्तुतः एकाच सद्वस्तूने ही सारी रूपे धारण केली आहेत. म्हणून हिंदू धर्मात सर्वकाही ईश्वरच मानले जाते. ईश्वराहून भिन्न अशी कोणतीही वस्तू नाही. पशु, पक्षी, वृक्ष-वनस्पती, पर्वत, नद्या, सर्वांनाच, एवढेच नाहीतरी विषारी नागालाही ईश्वर मानून त्यांची सेवा करण्याचे, त्यांच्यावर प्रेम करण्याचे हिंदू धर्म शिकवितो.

या परमानुभूतीने आपल्याला ज्ञान होते की ज्याप्रमाणे शरीराचे भिन्न अवयव आपल्याहून भिन्न नाहीत, त्याचप्रमाणे सर्व व्यक्ती व वस्तू आपल्याहून अभिन्न आहेत. जो बोध आजपर्यंत आपल्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित होता, त्याचा समस्त प्रपंचात विस्तार होऊन तो बोध सर्वसमावेशक होतो. आपल्या पायाच्या एका बोटाला काटा टोचल्यावर आपल्याला जशी वेदना होते, त्याचप्रमाणे दुस-यांचे दुःखही आपले स्वतःचेच दुःख बनते. अग्नीच्या उष्णतेप्रमाणे, पाण्याच्या शीतलतेप्रमाणे, फुलाच्या मध व सुगंधाप्रमाणे आत्मानुभूती प्राप्त महात्म्याचा परम करुणा हा सहज स्वभाव बनून जातो. दुस-यांना सांत्वना देणे हा त्यांचा सहज स्वभाव बनतो. जेव्हा आपले स्वतःचेच बोट आपल्या डोळ्यात जाते तेव्हा आपण बोटाला शिक्षा करीत नाही. आपण त्याला क्षमा करतो. एवढेच नाही तर त्या हातानेच आपण दुख-या डोळ्याला सांत्वना देतो. याचे कारण असे की बोट व डोळा आपल्याहून भिन्न नाहीत.

दुस-यांमध्ये आत्मदर्शन करण्याच्या स्तरापर्यंत सर्वांनांच उन्नत करणे हे हिंदू धर्माचे लक्ष्य आहे. व्यक्तीपुरताच मर्यादित असलेला अस्तित्वाचा बोध अथवा ‘मी’ पणाचा बोध विश्वव्यापी बनवून व्यक्ती ईश्वराशी एकरूप होते व पूर्णत्वाला पावत. समस्त प्रपंचात ईश्वरदर्शन करण्याचा तसेच ईश्वर व आपल्यात अभिन्नतेचा अनुभव करण्याचा उपदेश हिंदू धर्म देतो. या लक्ष्यप्राप्तीसाठी कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, इत्यादी अनेक मार्गही दर्शवितो.

इतर सणांसारखेच नवरात्राचेही अनेक पैलू आहेत. जर याचा आंतरिक अर्थ घेतला तर आपण एका साधकाची आध्यात्मिक यात्रेचा क्रम व गति त्यात पाहू शकतो. साधकाच्या या यात्रेचे तीन सोपान मानले जाऊ शकतात आणि या तीन सोपानांचे प्रतिनिधित्व करतात दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती. हे तीन सोपान पार केल्यावर दहाव्या दिवशी जेव्हा लक्ष्याची प्राप्ती होते तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.

शक्तीच्या माध्यमातूनच शिवाला जाणले जाऊ शकते. मूल स्वाभाविकरीत्या आपल्या आईशी जोडलेले असते. त्याच्यात आईबद्दल अधिक जवळीक असते. आध्यात्मिक क्षेत्रातही देवीशी तादात्म्य स्थापित करणे अधिक सोपे आहे कारण ती मातृस्वरूप आहे. आदिशक्तिच आपल्याला परमशिवापर्यंत पोहोचविते.

तसेच या पर्वाचा संबंध प्रभू रामचंद्राशीही आहे. विजयादशमी दसरा, दशहरा या नावाने भारतभर प्रचलित आहे. या दिवशीच प्रभू रामचंद्रांनी दशमुखधारी रावणाचा वध करुन आसुरी शक्तीवर विजय मिळविला होता. आपण श्रीरामाची कथा जरी घेतली तरी आपल्याला त्यातून अनेक आध्यात्मिक तत्त्व व ईश्वरप्राप्तीचा संदेश मिळू शकतो. सीतादेवी मनाचे प्रतीक आहे तर श्रीराम आत्म्याचे. मन जेव्हा आत्म्यात लीन असते तेव्हा ते आनंदाचा अनुभव करते. मग ते वनात असो की राजमहालात याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. जेव्हा मनात इच्छा उठतात तेव्हा त्यांचा वास्तविक अंत दुःखातच होतो. परंतु त्या इच्छा स्वर्णमयी वेष धारण करुन मनाला भरकटायला लावतात आणि त्यातून मनाचा आत्म्याशी वियोग होतो. सीतेच्या मनात सुवर्णमृग प्राप्त करण्याची इच्छा उठली. श्रीरामाने परोपरीने समजावून सीता समजू शकली नाही आणि तिने श्रीरामाला तो सुवर्णमृग पकडून आणण्यास पाठविले. लक्ष्मण तपस्येचे प्रतीक आहे. परंतु सीतेने मोहाच्या आहारी जाऊन तपस्यारूपी लक्ष्मणालाही बाहेर घालवून दिले. आता मनरूपी सीतेकडून भगवंतही सुटला आणि तपस्याही सुटली. बाहेर जातेवेळी लक्ष्मण एक रेषा ओढून गेले ती लक्ष्मणरेषा म्हणून प्रसिद्ध आहे. ही रेषा कोणत्याही परिस्थितीत ओलांडू नये असे लक्ष्मणाने सीतेला जाता जाता सांगितले. जोपर्यंत सीता त्या रेषेच्या आतमधे होती तोपर्यंत ती सुरक्षित होती. ती रेषा होती निष्ठा आणि जीवनातील मर्यादेची. मोहग्रस्त सीता त्या रेषेच्या जवळ येताच वासनारूपी रावणाने सर्वशक्तीनिशी सीतेचे अपहरण केले आणि तिला भगवंताच्या वियोगाचे दुःख सहन करावे लागले.

दस-याला दशहरा असेही म्हटले जाते. त्याचा अर्थ आहे दहा मुख असलेल्या रावणावर विजय. ज्याने आपली दहा इंद्रिये वश केली आहे तो दशरथ आणि येथेच श्रीरामाचा जन्म होतो. जो पूर्णतः आपल्या दहा इंद्रियांच्या अधीन आहे, जो पूर्णतः बहिर्मुख आहे तो आहे दशमुख रावण. जेव्हा इंद्रियांचे दमन होते, जेव्हा दशमुखी अहंकाराचा वध होतो आणि नंतर सीतेचे श्रीरामाशी मिलन होते.

जीवनाचे ध्येय आहे आत्मसाक्षात्कार प्राप्ती, आपल्याच आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे. भगवद्गीतेत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण ज्ञानीचे लक्षण सांगतात. हे यासाठी नाही की साधारणतः या लक्षणांचा मापदंड घेऊन एखाद्या महात्म्याची कसोटी पहावी किवा या कसोटीवर कोणी उतरला तर तो आत्मसाक्षात्कारी आहे असे समजावे. ही लक्षणे एवढ्यासाठी सांगितली आहेत की आपणही ही लक्षणे, हे गुण आपल्यात जाणीवपूर्वक रुजविण्याचा, ते वृद्धिगत करण्याचा प्रयत्न करावा. अम्मा म्हणतात की श्रीरामाची गाथा श्रीराम बनण्यासाठी आहे. साधना पथावर साधकाला प्रथम आपल्यातील दुष्प्रवृत्तीचे निराकरण करावे लागते. एका मर्यादेपर्यंत दुष्प्रवृत्तींचे निराकरण केल्यावर दिव्य गुणांच्या वाढीसाठी श्रम करावे लागतात आणि त्यानंतरच आत्मज्ञानाचा उदय होतो.

पहिले तीन दिवस दुर्गामातेची पूजा होते. मातेला पराशक्तिच्या रूपात, आपल्या नकारात्मक प्रवृत्तींचा विध्वंस करणाःया परमशक्तिच्या रूपात पूजले जाते. मधु आणि कैटभ भगवान विष्णुच्या कर्णमला पासून उत्पन्न झालेले राक्षस आहेत. दुर्गामोतेची पूजा या संकल्पाने केली जाते की तिने आपल्यातील मल अर्थात अहंकार व अहकारजनित इतर दुष्प्रवृत्तींचा नाश करावा. केवळ दुष्प्रवृत्तींचा नाश केल्याने आपण त्यापासून कायमचे मुक्त होत नाही. वासनांचे बीज तर सुप्तावस्थेत आपल्यामधेच असते. म्हणून पुढची पायरी आहे सद्प्रवृत्ती आणि सद्गुणांची वृद्धी. या सद्गुणांनाच भगवद्गीतेत दैवी संपत्ती म्हटले आहे. संपत्तीचा अर्थ धनही आहे. म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो. लक्ष्मी केवळ स्थूल धनसंपत्ती प्रदान करणारी देवी नाही. ती तर आई आहे जी आपल्या लेकरांच्या आवश्यकतेनुसार देत असते. लक्ष्मीच आपल्याला आध्यात्मिक ज्ञानही देते, त्यापासूनच सत्याचे अमूल्य रत्न आपल्या हाती लागते.
दैवी संपत्तीने संपन्न असलेला साधकच ज्ञानाचा अधिकारी असतो. म्हणूनच शेवटचे तीन दिवस सरस्वतीची पूजा केली जाते. सरस्वती देवी ज्ञानस्वरूप आहे. ती साधकाला परमज्ञानाचे दान देते. सरस्वतीचे श्वेतवस्त्रही परमज्ञानाचे प्रतीक आहे.

दहावा दिवस सत्यप्राप्तीचा दिवस असल्याने विजयोत्सवाच्या स्वरूपात साजरा होतो. साधनेच्या माध्यमातून दुर्गुणांचे निराकरण करुन, सद्गुणांची निवड करुन, त्यांचा विकास करुन साधक जेव्हा ज्ञानप्राप्ती करतो तेव्हा तो ह्या तिन्ही पायःया ओलांडून आत्मज्ञानाची प्राप्ती करतो. आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करतो.

नवरात्र केवळ साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीचा गाथाच नाही. येथे साधनाक्रमाचे निर्देशही दिले आहेत. प्रथम मनःशुद्धी झाल्याशिवाय कोणीही ज्ञानप्राप्ती करु शकत नाही. अम्मा म्हणतात की, पुस्तकपंडीत वा प्रवचनकार यांच्या केवळ जिव्हेवरच ब्रह्म असते. जीवनाच्या विभिन्न परिस्थितीत त्यांच्या वचनांचा पोकळपणा सिद्ध होतो.

नवरात्र केवळ साधकांसाठीच नाही तर सर्वसाधारण लोकांसाठीही तेवढेच महत्वपूर्ण आहे. सर्व बाधा, सर्व समस्यांचा नाश करण्यासाठी दुर्गामातेची पूजा केली जाते. लक्ष्मी सर्व सुख-ऐश्वर्य प्रदान करते आणि सरस्वती ज्ञान प्रदान करते. या तिन्हींची प्राप्ती केल्याविना जीवनाची पूर्तता होत नाही.
देवीची ही भिन्न रूपे, भिन्न शक्ती नसून ती मातेचीच भिन्न-भिन्न रूपे आहेत. आपल्या संतानाच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार पराशक्तिच भिन्न रूप व भाव धारण करते.
जाता जाता हेही सांगणे आवश्यक आहे की आपले सण अशावेळी साजरे केले जातात की त्यावेळी आपल्या उपासनेचा, आपल्या साधनेचा जास्तीत जास्त लाभ होईल.

दिनांक 27 सप्टेंबर रोजी अम्मांचा 57 वा जन्मदिन सोहळा अमृतपुरीच्या पैलतीरावरील अमृता विश्वविद्यापीठाच्या प्रांगणात भव्यदिव्य स्वरूपात साजरा झाला.

आत्मज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असलेल्या, जन्ममृत्यूच्या पार गेलेल्या अम्मा आपला या धरणीवरील अवतरणदिन साजरा करण्यास कधीच उत्सुक नसतात. पण या निमित्ताने जगभरातील सर्व जातीधर्मांचे लाखो लोक एकत्र येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात, समाजातील दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी निष्काम भावनेने प्रेरीत होऊन सेवा करतात, म्हणून अम्मा अवतरणदिन साजरा करण्याची परवानगी देतात.

दरवर्षी जन्मदिनी अम्मा नवनवीन सेवायोजनांची घोषणा करुन त्यांची अंमलबजावणी लगेच सुरु करतात, आणि जगभरातील अम्मांचे भक्तही तोच अम्मांचा जन्मदिन संदेश समजून त्यावर कार्य सुरु करतात. यावर्षीही अम्मांनी काही अभिनव सेवा योजनांची घोषणा केली.

दरवर्षीप्रमाणे अम्मांच्या जन्मदिन सोहळ्याची सुरुवात पहाटे ‘सूर्य कालडी जयसूर्यन् भट्टात्तिरीपाद’ यांच्या महागणपती होमाने झाली. त्यानंतर हजारो भक्तांनी विश्वशांतीसाठी श्रीललितासहस्रनाम अर्चनेत भाग घेतला. त्यानंतर स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी यांचे अम्मांचे जीवन, त्यांचा उपदेश व कार्याची ओळख करुन देणारे हृदयस्पर्शी प्रवचन झाले.

सकाळी ठीक 9 वाजता अम्मांचे मंचावर आगमन झाले. मेडिकल कॉलेजच्या विथ्यार्थिनींनी मोहिनीअट्टम हे नृत्य सादर करुन अम्मांचे मंचावर स्वागत केले. स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी यांनी अम्मांच्या जगभरातील भक्तांच्या वतीने अम्मांची पाद्यपूजा केली. तदनंतर अम्मांच्या ज्येष्ठ संन्यासी शिष्यांनी जगभरातील कोट्यावधी भक्तांच्या वतीने अम्मांना पुष्पहार घालून आपली श्रद्धासुमने अम्मांना अर्पण केली. त्यानंतर अम्मांचे हृदयस्पर्शी प्रवचन झाले.

आपल्या प्रवचनात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांना उद्देशून अम्मा म्हणाल्या, “जागतिकीकरणाच्या माध्यमातून जगभर संपर्क प्रस्थापित झाला असूनही जग अजूनही दुःख भोगतच आहे. आपले कुठे चुकले आहे? बाह्य संपर्क साधनांनी अवघे जग एखाद्या लहान खेड्यासारखे जवळ आले आहे. तथापि त्याचवेळी आपण आंतरिक सद्वस्तूंचे ऐक्य साधण्यात- सर्व हृदये व मने परस्परांशी जोडण्याकडे पुरेसे लक्ष देण्यात अपयशी ठरलो आहोत.”
निसर्गाप्रति आदरभाव विकसित करण्याची आवश्यकता, अंमली पदार्थांचे सेवन रोखण्याची आवश्यकता, धर्माधिष्ठित आचरणाची आवश्यकता, ध्यानधारणेची जीवनातील भूमिका इत्यादी अनेक विषयांना अम्मांनी स्पर्श केला.

प्रवचनाच्या शेवटी अम्मांनी भारतातील प्रदूषण व घाणीचे साम्राज्य या कळीच्या विषयाला हात घातला. त्या म्हणाल्या, “स्वच्छताच ईश्वर तत्त्व आहे. वन, सागर, पर्वत, नदी या सर्व गोष्टींना निसर्गप्रदत्त एक सौंदर्य आहे. निसर्गाला या सर्व गोष्टींची साफसफाई करण्याची गरज पडत नाही. निसर्गतः या गोष्टी घाण होत नाही, पण मनुष्य मात्र या सर्वांना घाण करीत आहे. तसेच मनुष्य जे काही निर्माण करतो ते मात्र नेहमीच साफ ठेवण्याची, दुरुस्ती करण्याची गरज पडते.

“आपली सार्वजनिक स्थळे, शौचालये, प्रसाधनगृहे, रस्ते या सर्वांची आपण घोर उपेक्षा केली आहे. सार्वजनिक स्थळे अत्यंत घाण आहेत, त्यांची सफाई होत नाही, म्हणून आपणच आपल्या देशाला पदोपदी नावे ठेवीत असतो. सार्वजनिक अस्वच्छतेमुळे बाहेरचे देशही आपल्याला हसतात. राष्टकुल स्पर्धेत खेळाडूंसाठी ज्या खोल्या बनविल्या आहेत, त्यावरही लोक पान खाऊन थुंकले आहेत. बाहेरच्या देशातील टी.व्ही. वर अस्वच्छतेचं हे सारं चित्र दाखवून ते आपल्या देशाची टर उडवित आहेत. विदेशातील मासिकांमध्ये आपल्या रस्त्यांची दुर्दशा व घाणीच्या संदर्भात खूप लेख छापून येत आहेत. हे सारं पाहून अम्माला खूप वाईट वाटते. भारत अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहे. भारत विज्ञान, तंत्रज्ञान व आर्थिक क्षेत्रात प्रगती करत आहे. प्रसिद्ध झालेले अनेक अहवाल सांगत आहेत की 2025 साली भारत जगातील तिसरी महासत्ता म्हणून उदयास येईल. असे असले तरी पर्यावरण स्वच्छता, आपल्या राहत्या परिसराची साफ-सफाई याबाबतीत मात्र आपण अजूनही खूप मागे आहोत. मातृभूमीच्या अभिमानाला गालबोट लागते तेव्हा आपल्या मनाला दुःख वाटले पाहिजे, आणि ते दूर करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याबद्दल प्रामाणिकपणे विचारही केला पाहिजे. आपल्याकडून जे काही होऊ शकते ते आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे.

“वर्तमानपत्रे, पत्रकार व टीव्ही चॅनेलच्या सहकार्याने खूप मोठे परिवर्तन घडून येईल असा अम्माचा विश्वास आहे. केरळात संपूर्ण साफसफाईचा एक नवा अध्याय सुरु व्हावा यासाठी अम्माने प्रयत्न केला आहे. सफाईच्या कामात जे काही सेवक व सेवादल कार्य करीत आहेत त्यांच्यासाठी सायकलींची व्यवस्था केली आहे.”

नंतर अम्मांनी घोषणा केली की, “राज्य सरकार व शाळांच्या व्यवस्थापन समित्यांचे सहकार्य व सहयोग असेल तर माता अमृतानंदमयी मठ भारतभरातील सरकारी शाळा व सार्वजनिक स्थळी शौचालये-स्वच्छतागृहे बांधून देण्याची जबाबदारी उचलण्यास तयार आहे. मठ सर्वप्रथम ही योजना प्रायोगिक तत्त्वावर केरळात सुरु करील आणि त्यानंतर भारतातील अन्य राज्यांतही या योजनेचा विस्तार करण्यात येईल.

“आपापल्या परिसरातील रहिवाशांनी स्वच्छता समित्या स्थापन कराव्यात. साधारणतः प्रत्येक समितीने दोन किलोमीटर अंतराची स्वच्छता करण्याची जबाबदारी उचलावी. अशा रीतीने समित्यांची शृंखला तयार झाली तर खरोखरच अभूतपूर्व परिवर्तन घडून येईल. या समित्यांनी आपापल्या भागांमध्ये कचरा कुंड्यांची व्यवस्था करावी. ‘रस्त्यावर कचरा टाकू नये’ व ‘रस्त्यावर थुंकू नये’, असा संदेश देणारे फलक जागोजागी लावावेत. कचराकुंडीत जमा झालेला कचरा वेळोवेळी काढून, त्याची प्रतवारी करुन विल्हेवाट लावावी. तसेच शाळेतील मुलांनी रस्त्यावर न थुंकता त्यासाठी त्यांना हातरूमालाचा उपयोग करण्याची सवय लागावी म्हणून शाळांमध्ये दहा लाख हातरूमाल मोफत वाटण्यात येतील. अशाप्रकारे रस्त्यावर थुंकण्याची सवय संपुष्टात आली तर कित्येक आजारांना पायबंद बसू शकेल.”

हजारो भक्तांनी टाळ्यांच्या गजरात अम्मांच्या या अभिनव घोषणेचे स्वागत केले.

अम्मांच्या प्रवचनाचे स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी यांनी इंग्रजीत भाषांतर केले. त्यानंतर त्यांनी मान्यवर अतिथींचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात ते म्हणाले, “आज सा-या जगाचे डोळे अम्मांकडे लागले आहेत, आणि अम्मा काय करत आहेत? त्या आपली दृष्टी गरीब, गरजू, निराधार विधवा, अपंग, दुःखपीडित, पददलित, आजारी, नैराश्याने ग्रासलेल्या लोकांकडे वळवित आहे. वस्तुतः हा अम्मांच्या जन्मदिन संदेशाचा- उपदेशाचाच एक भागच आहे. आपण जेव्हा स्वतःचा विचार करण्याआधी दुसःयांच्या सुखाचा विचार करतो तेव्हाच खराखुरा जन्म होतो. सारे जग तुमच्या हृदयांत घ्या आणि मुक्त व्हा. हाच तर अम्मांच्या संदेशाचा गाभा आहे.”

केन्द्रिय मंत्री श्री. श्रीप्रकाश जयस्वाल, श्री. गुरुदास कामत, श्री. के.पी. थॉमस, विदर्भातील माजी आमदार श्री. विजय जाधव, तसेच केरळ, तमिळनाडूतील अनेक आमदार या प्रसंगी उपस्थित होते.

27 सप्टेंबर रोजी श्रीमाता अमृतानंदमयी देवी तथा अम्मांच्या जन्मदिनोत्सव प्रसंगी कालडीच्या श्रीशंकराचार्य संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एन.पी. उन्नी यांना त्यांच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक व भारतीय तत्त्वज्ञान या क्षेत्रातील महान योगदानाबद्दल या वर्षीचा अमृतकीर्ति पुरस्कार देण्यात आला. ब्रांझचे सरस्वती शिल्प, 123456 रूपये रोख व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. एन् पी. उन्नी यांनी सांस्कृतिक, आध्यात्मिक व भारतीय तत्त्वज्ञानावर विपुल लेखन केले आहे. याखेरीज विविध शासकीय व बिगरशसकीय शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापकाच्या भूमिकेतून त्यांनी भारतीय संस्कृतीचे संवर्धन व जोपासनेसाठी भरीव कार्य केले आहे. पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर आपल्या भाषणात ते म्हणाले, “माझे जीवन आत्मोन्नतीसाठी समर्पित आहे, आणि त्यासाठी मी सद्गुरु अम्मांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाची कामना बाळगतो. ”

अमेरिकन पत्रकार श्रीमती ज्यूडिथ कॉर्नेल यांनी इंग्रजीत लिहिलेले अम्मांचे जीवनचरित्र
“Amma: Healing the Heart of the World” या पुस्तकाच्या मल्याळम् आवृत्तीचे प्रकाशन या प्रसंगी झाले.

अम्मांचे जीवनचरित्र व उपदेशपर पुस्तकांचे संपूर्ण भारतभर वितरण करण्यासाठी ‘अमृता बुक्स’ या प्रकाशन संस्थेचेही उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले. या प्रकाशन संस्थेच्या वतीने सर्वप्रथम अम्मांचे जीवन चरित्र व स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी यांनी संकलित केलेल्या from Amma’s Heart
या दोन पुस्तकांचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.

अम्मांच्या आश्रमाची अधिकृत वेबसाईट आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध होती. या वेबसाईटच्या भारतीय भाषेतील आवृत्तींचे उद्घाटन मार्थोमा चर्चचे बिशप मार क्रिसोस्टेम मेट्रोपोलिटीन यांच्या हस्ते झाले.

www.amrita.in ही वेबसाईट आता मल्याळम, तमिळ, तेलुगु, कन्नड, मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली व संस्कृत अशा नऊ भारतीय भाषांमध्ये पाहता येईल. लवकरच गुजराथी व उडिया या भाषेतही ही वेबसाईट सुरु होईल. आता भारतीय लोक जगभरातून कोठूनही आपल्या मातृभाषेतून अम्मांचा उपदेश वाचू शकतील.

दरवर्षी अम्मांच्या जन्मदिन प्रसंगी नवनवीन सेवायोजनांचा प्रारंभ होतो. यावर्षीही अम्मांनी काही अभिनव सेवायोजनांची घोषणा केली.

अमृताश्री सुरक्षा – अमृताश्री सुरक्षा ही योजना मठाच्या पुढाकाराने सुरु झालेल्या अमृताश्री बचतगट व आर्युविमा (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त सहकार्याने सुरु होत आहे. माता अमृतानंदमयी मठ एल.आय.सी. च्या माध्यमातून अमृताश्री बचतगटाच्या सदस्या असलेल्या एक लाख महिला व त्यांच्या कुटुंबियांना विमा संरक्षण देईल. केन्द्रिय मंत्री श्री. गुरुदास कामत यांनी मठाच्या वतीने एल.आय.सी.चे क्षेत्रिय प्रबंधक श्री. दोरायस्वामी यांना विमा हप्ता म्हणून 15 लाख रूपयांचा धनादेश दिला. नंतर त्यांनी पॉलिसी चेक अमृताश्री बचत गटाचे संयोजक श्री. रंगनाथन् यांना सुपूर्द केले.

केरळात नुकत्याच आलेल्या वादळाने आश्रमाजवळील चार मच्छिमारांचा जीव घेतला होता. या चार मच्छिमारांच्या विधवांचा पेन्शन यादीत समावेश करुन त्यांना प्रत्येकी 1000 रूपयांचा प्रथम धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच विद्यामृतम् शिष्यवृत्ती व अमृतनिधी पेन्शन योजनेत नवीन लाभधारकांचा समावेश करुन या योजनांचा आणखी विस्तार करण्यात आला. तसेच सर्व लाभधारकांच्या पेन्शनच्या रक्कमेतही यावर्षीपासून वाढ करण्यात आली आहे. केन्द्रिय व राज्य मंत्र्यांच्या हस्ते हे धनादेश लाभार्थींना वाटण्यात आले.

अमृता विश्वविद्यापीठ व अमृता विद्यालयांचे सर्व विद्यार्थी तसेच अमृता युवा धर्मधाराच्या सर्व सदस्यांनी पर्यावरण रक्षण व संपूर्ण भारत स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या कार्यात कटिबद्ध राहण्याची शपथ याप्रसंगी घेतली. स्थानीक तरुणांनी तंबाखू, दारु व अन्य अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही अशी शपथ घेतली.

मान्यवर अतिथींनी अम्मांच्या कार्याच्या गौरव करणारी भाषणे केली.

दरवर्षीप्रमाणे 54 जोडप्यांची सामूहिक विवाहसोहळ्यात लग्ने लावण्यात आली. वस्त्र, दागिने, संसारोपयोगी भांडी इत्यादी सर्व खर्च आश्रमाच्या वतीने करण्यात आला. दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अम्मांचे मंचावर आगमन झाले आणि तब्बल चोवीस तासांनी दुसःया दिवशी सकाळी नऊ वाजता सर्व उपस्थित भक्तांना दर्शन देऊनच अम्मा आसनावरुन उठल्या.
जन्मदिन सोहळा संपवून आश्रमात परत येतांना वाटेत अम्मांनी आपल्या वयोवृद्ध आईकडे जाऊन त्या माऊलीलाही जगन्मातेच्या रूपात दर्शन देऊन धन्य केले.

माता अमृतानंदमयी मठ शाळा व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणार

अमृतपुरी, दिनांक 22 सप्टेंबर 2010 रोजी अम्मा (श्रीमाता अमृतानंदमयी देवी) म्हणाल्या की,
“जर राज्य सरकारे व अन्य संस्थांनी सहयोग व सहकार्य केले तर माता अमृतानंदमयी मठ संपूर्ण भारतभरातील शाळा व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्यास तयार आहे. भारत विकास करीत आहे, असे म्हटले जात असले तरी परिसर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याबाबत आपण अजूनही खूप मागे आहोत. आपले रस्ते व सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था याचा पुरावा आहे.

“परदेशात रस्ते, सार्वजनिक स्थळे व स्वच्छतागृहे कमालीचे स्वच्छ व नीटनेटकी असतात. याउलट भारतातील रस्ते व सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत गलिच्छ आहेत. रस्त्याच्या बाजूला लघवी करणे, रस्त्यावर व सार्वजनिक स्थळी थुंकणे ही भारतातील लोकांची एक सवयच बनली आहे. कचराकुंडी असली तरी लोकांना कचरा व उष्टे-खरकटे अन्न कचराकुंडीत टाकण्याची सवय नाही. लोक कचरा व अन्न असेच रस्त्याच्या बाजूला, अनेकदा रस्त्यातच टाकतात. परिसर शुद्धी व स्वच्छता हे विकासाचे, संस्कृतीचे व सभ्यपणाचे एक महत्वाचे अंग आहे.

“परिसर साफ ठेवण्यासाठी आपण एक विशाल जनजागृती मोहीम हाती घेतली पाहिजे. त्यासाठी सार्वजनिक स्थळी, बस स्टँडवर व रस्त्याच्या बाजूला परिसर शुद्धी व स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावले पाहिजे.”

अम्मा पुढे म्हणाल्या , ”ही मोहिम यशस्वी होण्यासाठी टी.व्ही. व वृत्तपत्रे इत्यादी प्रसारमाध्यमांचे प्रामाणिक सहकार्य व आधारही अत्यंत महत्वाचा आहे. जर राज्य सरकारे, शाळांच्या व्यवस्थापन कमिट्या व स्थानीक लोकांचा सहयोग व सहकार्य मिळाले तर माता अमृतानंदमयी मठ सार्वजनिक स्थळी व शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधून देण्यास तयार आहे. ”
सुनिश्चित नियोजन आणि विद्यार्थी व स्थानीक लोकांच्या सहकार्यातून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

ही योजना सर्वप्रथम केरळमध्ये कार्यान्वित होईल. त्यानंतर क्रमशः भारताच्या इतर राज्यात ती कार्यान्वित होईल.

न्यूयॉर्क 2000

“खरा बदल अंतःकरणातच घडायला हवा ”

परिवर्तनाच्या मोठ्या आशाआकांक्षा मनी बाळगून आपण नव्या सहस्राब्दात पदार्पण केले आहे. परंतु नुसतेच वर्षदर्शक आकडे बदलले आहेत, मूलभूतपणे काहीच परिवर्तन घडलेले नाही. खराखुरा बदल तर आपल्या अंतःकरणातच घडून यायला हवा. कारण आपल्या अंतःकरणातून संघर्ष व नकारात्मकता काढून टाकली तरच आपण शांतीच्या प्रस्थापनेत खरीखुरी विधायक भूमिका बजावू शकतो. जगाच्या विनाशासाठी सज्ज असलेली संहारक अण्वस्त्रे नुसतीच संग्रहालयात हलवून जगात शांती अवतरणार नाही; तर सर्वप्रथम मनाची संहारक अण्वस्त्रे आपण नष्ट केली पाहिजे.

सहस्राब्द विश्वशांती परिषदेत.(न्यूयॉर्क येथे युनोच्या आमसभेत)