अनेकांसाठी ईश्वर आराधना एक अंशकालीन, पार्टटाईम कार्य असते, आपल्याला अशा पार्टटाईम भक्तीची नव्हे तर पूर्णकालीन भक्तीची आवश्यकता आहे. एखाद्या लौकिक इच्छेच्या पूर्तीसाठी केली जाणारी पूजा, प्रार्थना पार्टटाईम भक्ती प्रकारात मोडते. परंतु आपल्याला आवश्यकता आहे ती केवळ भक्तीसाठी भक्तीची. केवळ ईश्वर प्रेमाचीच इच्छा बाळगून त्यासाठीच प्रार्थना केली पाहिजे, सदैव ईश्वरस्मरण केले पाहिजे. सर्वांमध्ये ईश्वर पाहिला पाहिजे. आपल्याला प्रार्थना करण्याची शक्तीही ईश्वरच देतो. जर परमात्म्याची शक्ती नसेल तर आपण साधा आपला हातही हलवू शकणार नाही. सारंकाही ईश्वरच करीत आहे हा बोध निरंतर जागृत ठेवणे हीच पूर्णकालीन भक्ती होय. या बोधाच्या माध्यमातूनच आपण शरीर मनोबुद्धीत अधिष्ठित ‘मी’पणाचा भाव सोडून सर्वव्यापी चैतन्य बनू शकतो.

कालिदासाची एक कथा आहे. त्याने मंदिरात प्रवेश करून आंतून दरवाजा बंद केला. देवीने येऊन दार ठोठावले. परंतु त्याने दार उघडले नाही. देवीने विचारले, ‘आत कोण आहे?’ लगेच आतून एक प्रतिप्रश्न विचारला गेला, ‘बाहेर कोण आहे?’ देवीने उत्तर दिले, ‘बाहेर काली आहे.’ यावर आतून पहिल्या प्रश्नाचे उत्तर आले, ‘आंत दास आहे.’ देवीने प्रश्न विचारूनही त्याने मी अमूक व्यक्ती आहे असे म्हटले नाही, आपले नाव सांगितले नाही. बाहेर काली आहे असे सांगितल्यावर आत ‘दास’ आहे असे उत्तर दिले आणि त्याच क्षणी त्याला देवीचे पूर्ण दर्शन मिळाले.

‘मी’ चा अंत झाला की केवळ तूच शिल्लक उरतो. ‘मी’पणाशी संबंधित संकुचित व्यक्तित्व नष्ट होते. केवल भगवद् इच्छाच बाकी उरते. कर्ता करविता तो एक परमात्माच आहे, हा बोध निरंतर जागृत ठेवणे हीच यथार्थ भक्ती आहे. अशा भक्तीने सारंकाही मिळून जाते, काहीही अप्राप्य उरत नाही.

भगवंताला आपल्याकडून काहीही नको आहे. आपण भगवंताला धूपदीप अर्पण करतो. या गोष्टी भगवंताला हव्यात म्हणून आपण त्याला त्या अर्पण करीत नाहीत. खरंतर आपल्या डोळ्यांची ज्योतीही ईश्वरप्रदत्त आहे. असे असताना दोनचार रुपयांच्या आपल्या दिव्याच्या ज्योतीची त्या भगवंताला काय आवश्यकता? परंतु ईश्वराचा आश्रय घेतला तर त्यात आपलाच लाभ आहे. आपण देवाला जे काही अर्पण करतो, ते आपल्या समर्पणाचे प्रतीक असते. अशा रीतीने आपल्यात समर्पणभाव विकसित होतो. एवढेच नाही तर तेला-तुपाच्या दिव्यातून निघणारा धूर वातावरणाचीही शुद्धी करतो. याउलट आपल्या कार्य सिद्धीसाठी देवाला काही अर्पण करुन त्याला आमिष दाखवित आहोत, लाच देत आहोत अशा भावनेने पाहू नये.

बीज कितीही उत्तम असले पण ते जर हातातच राहिले तर ते अंकुरित होणार नाही. मातीत लावल्यावरच ते अंकुरित होईल. असा समर्पणभाव जागल्यावरच फलप्राप्ती होईल. याचप्रमाणे ‘मी आणि माझ्या इच्छांची पूर्ती’ हा मनोभाव सोडून देऊन सारंकाही भगवंताचेच आहे, त्याच्या इच्छेनुसार सारंकाही होवो या मनोभावाचा विकास झाला पाहिजे. अशा समर्पणभावानेच भक्ती परिपूर्ण होईल.

माझ्या मुलांनो, मन अशी एखादी वस्तू नाही की जी आपण उचलून देवाला अर्पण करुन टाकावी! म्हणून मन ज्या कोणत्या विषयवस्तूंत अडकले आहे, तिच समर्पण मनाच्या समर्पणाचे प्रतीक मानले जाते.

समर्पण म्हटल्यावर काही लोकांना वाटेल की ईश्वराला काही अर्पण केल्यावरच फलप्राप्ती होईल. आपण समर्पणाचा अर्थ अशाप्रकारे लावू नये. आपण सारे मनोबुद्धीच्या स्तरावरच आहोत. मी शरीर आहे, मी अमुक व्यक्ती आहे, मी अमुक व्यक्तीचा पुत्र आहे, माझं नाव अमुक आहे. अशाप्रकारे आपण या ‘मी’ बरोबर ज्या काही उपाधी जोडून ठेवल्या आहेत त्या सर्वांचा त्याग घडला पाहिजे. अहंकार! केवळ हीच एक आपली सृष्टी आहे. त्याचाच परिपूर्ण त्याग करायचा आहे. त्याचेच भगवंताला समर्पण करायचे आहे. त्याचे समर्पण केल्यानंतर जे काही शेष राहील ती ईश्वरसृष्टीच असेल. त्यानंतर आपण भगवंताच्या ओठांवरील मुरली बनून जाऊ. नाद उद्घोष करणारा शंख बनून जाऊ. त्यासाठी आपल्या व्यक्तित्वाचा त्याग करणे पर्याप्त आहे. ‘मी’ आणि ‘माझे’पणाचा त्याग केल्यावर व्यक्तीत्व उरत नाही, फक्त सर्वव्यापी चैतन्यच उरते. ज्याप्रमाणे बीज हातात ठेवल्याने ते अंकुरित होत नाही, खडकावर टाकल्यावरही ते अंकुरित होत नाही. ते मातीतच पेरले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही कर्माचे उचित फळ मिळण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. समर्पणभावाचे जागरण झाले की भगवंताच्या कृपेने सारंकाही स्वयमेव सिद्ध होते. भगवद्चरणी आपण आपल्या मनाचे समर्पण केले पाहिजे.

माझ्या मुलांनो, मन अशी एखादी वस्तू नाही की जी आपण उचलून देवाला अर्पण करुन टाकावी! म्हणून मन ज्या कोणत्या विषयवस्तूंत अडकले आहे, तिच समर्पण मनाच्या समर्पणाचे प्रतीक मानले जाते. काही लोकांना खीर खूप आवडते. म्हणून ते देवाला खीरीचा नैवेद्य दाखवितात आणि ती खीर जेव्हा काही गरीबांना प्रसाद म्हणून वाटली जाते तेव्हा तिचे प्रयोजन सार्थक होते. मानवाचे मन संपत्तीशी सर्वाधिक आसक्त आहे. त्या आसक्तीपासून मुक्ती मिळविण्यासाठी देवाला पैसे अर्पण केले जातात.

आपण मंदिरात जाऊन पुष्पांजलि अर्पण करतो. वस्तुतः ईश्वरचरणी आपले हृदयपुष्प अर्पण केले पाहिजे. जेव्हा आपण आपले मन ईश्वरचरणी अर्पण करतो तेव्हा तीच भक्ती होते व तेच वास्तविक समर्पण होते. परंतु त्या मनाचे प्रतीक म्हणून आपण पुष्प अर्पण करतो. जर मन दुःखभाराने पीडित असेल तर आपल्या दुःखांचे भगवंतासमोर निवेदन करण्यात काही चूक नाही. आपण आपल्या अंतरीचे दुःख भगवंताला सांगून त्याला आपल्या दुःखात वाटेकरी करुन आपले दुःख त्याच्या समोर हलके करु शकतो. परंतु आपली प्रार्थना भक्तीसाठी असली पाहिजे. केवळ त्यातूनच पूर्ण फल प्राप्ती होईल. तथापि आपण असे समजू नये की देवाला सारंकाही तपशीलवार सांगितले तरच त्याला समजेल.

वकील व डॉक्टरला सारंकाही मनमोकळेपणाने सांगितले तरच ते आपली समस्या चांगल्या प्रकारे समजू शकतील व त्यावर योग्य निदान करु शकतील. परंतु ईश्वराला काही सांगितले नाही तरी तो सारंकाही जाणतो. कारण ईश्वर सर्वज्ञ व सर्वान्तर्यामी आहे. ईश्वरप्रेमाची प्राप्ती व्हावी यासाठीच प्रार्थना केली पाहिजे. जेव्हा आपली प्रार्थना केवळ ईश्वरासाठीच असते तेव्हा न सांगताही ईश्वर आपल्या गरजांची पूर्ती करतो, आपला योगक्षेम वाहतो. आपण ईश्वराशी एकरूप होण्याची प्रार्थना केली पाहिजे. अशी प्रार्थना केली तर भगवंताची कृपा सहजतेने आपल्याकडे प्रवाहित होईल आणि आपण ईश्वरीय गुणांनी संपन्न होऊ.