अम्मांचा नववर्षाचा संदेशातील काही भाग

अम्मांनी नववर्षाच्या संदेशामध्ये एक गोष्ट सांगितली होती.

एकेकाळी एक सत्यनिष्ठ व न्यायी राजा होता. त्याला दोन पुत्र होते. राज्याचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली तेव्हा दोघांपैकी कोण चांगला राजा बनू शकेल यावर तो गंभीरपणे विचार करु लागला. राज्य चालविण्याची पात्रता दोघांपैकी कोणामध्ये चांगली आहे हे पाहण्यासाठी त्याने दोघांची परीक्षा म्हणून एक साधा प्रयोग करण्याचे ठरविले. त्याने दोघांना बोलावून प्रत्येकास काही रक्कम दिली आणि सांगितले, “तुमचे दोघांचे स्वतंत्र महाल आहेत. या दिलेल्या पैशाचा वापर करुन तुम्ही तुमचे महाल कशानेही भरुन टाका. तुमच्यापैकी जो कुणी सूज्ञपणाने हे करुन दाखवील तो माझा उत्तराधिकारी बनेल. ”

मोठ्या मुलाने विचार केला, “ओह! पिताजींनी ही फारच थोडी रक्कम दिली आहे. एवढ्याशा रकमेतून संपूर्ण महाल भरुन टाकावा असे काय बरे विकत घेता येईल? ”

खूप विचार करुनही त्याला काहीच सुचले नाही. शेवटी वैतागून त्याने राज्यभरातील कचरा विकत घेतला आणि महालातील प्रत्येक खोलीत भरुन टाकला.
मोठ्या भावाप्रमाणे, लहान भावालाही याच विचाराने ग्रासून टाकले होते. परंतु तो विचार करत राहिला. आणि ब-याच विचाराअंती त्याला एक कल्पना सुचली. त्याने दिलेल्या पैशातून अत्तराची बाटली, तेल व दिवे विकत घेतले. साऱ्या महालात त्याने दिवे पेटविले व अत्तर शिंपडले. सारा महाल प्रकाश व सुगंधाने भरुन गेला. माझ्या मुलांनो, आपल्यापैकी सर्वांचीच ही कथा आहे. तो महाल म्हणजे आपले हृदय आणि ते पैसे म्हणजे आपले जीवन होय. निवड करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण आपले आयुष्य एकतर अविवेकी मार्गाने जगू शकतो किवा विवेकाने, देवाच्या इच्छेनुसार जगू शकतो. जर आपण विवेकाचा मार्ग निवडला तर आपण आपले व इतरांचेही आयुष्य माधुर्याने भरुन उजळून टाकू शकतो. कोणता मार्ग निवडायचा याचा निर्णय आपणच घ्यायचा आहे.

प्रश्न : अम्मा, आम्ही देवाच्या सगुण रूपावर का ध्यान करावे? निर्गुण निराकार परब्रह्मावर ध्यान केले तर काय हरकत आहे?

अम्मा :  बेटा, सत्य, प्रेम यासारख्या गुणांची तू एखाद्या रूपाविना कल्पना करु शकतोस का? ते शक्य नाही, कारण हे गुण निराकार आहेत. गुणांचा विचार करण्यासाठी आपल्याला एखाद्या वस्तूची जरुरी पडते की जिच्यात ती गुणवैशिष्टे स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत. असे असतांना सर्व कल्पनांच्या पार असलेल्या निर्गुण निराकार परब्रह्मविषयी काय बोलावे? आपले मन एवढे स्थूल आहे की ते अशा देवाचा विचारही करु शकत नाही की जो निर्गुण, निराकार व अपरिवर्तनीय आहे. म्हणून आपल्याला एखाद्या अशा विभूतींची जरुरी पडते जी दिव्य गुणांनी ओतप्रोत आहे. श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीबुद्ध या अशा दिव्य विभूती आहेत. आपल्या मनाला आधारासाठी कशावर तरी झुकण्याची नेहमीची सवय आहे. लहानपणी आईवडिलांनी आपल्याला गोंजारावे, आपले लाड, कौतुक करावे असे आपल्याला वाटते. थोडे मोठे झाल्यावर आपल्याला खेळण्यात गोडी वाटते, आपल्या समवयस्क मित्रांच्या संगतीत अधिकाधिक वेळ रहावे असे वाटते. नंतर शाळेत गप्पा मारण्यासाठी आपल्याला खूप मित्रमंडळी मिळतात. पुढे कॉलेजात गेल्यावर आपले मन मोकळे करण्यासाठी आपल्याला मित्रमैत्रिणी भेटतात. पुढे लग्न झाल्यावर आपल्या समस्या व काळज्या सांगण्यासाठी आपली पत्नी किवा पती असतो. अशाप्रकारे मन मोकळे करण्यासाठी मरेपर्यंत कुणी ना कुणी असतेच. अशाप्रकारे सांत्वना व दिलासासाठी सदैव कुणावर तरी अवलंबून असणारे मन अशा देवाची कल्पनाही करु शकत नाही की जो निर्गुण निराकार आहे. आपल्याला पूजाउपासनेसाठी देवाच्या नाम व रूपाची आवश्यकता असते.  म्हणून आपण म्हणतो की निर्गुण निराकार परब्रह्म कृष्ण व रामाच्या रूपात प्रकट झाले आहे. आपण या नामरूपात्मक सगुण ईश्वराशी एक आंतरिक नाते विकसित केले पाहिजे. इथे आपण त्यांच्या देहांची पूजाउपासना करीत नसून त्यांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या उच्च दिव्य तत्त्वांची आपण आराधना करीत असतो. निराकारावर ध्यान करण्यासाठीही उदात्त कल्पनेची जरुरी असते. ज्यांना जन्मजात अत्यंत सूक्ष्म मनाची देणगी लाभली आहे फक्त तेच निराकारावर ध्यान करु शकतात. पण असे किती लोक आहेत? 99 टक्के लोकांची मने अत्यंत स्थूल आहेत. त्यांच्यात सूक्ष्मता मूळीच नाही. थोड्याशा सूक्ष्म मनाच्या भक्तांसाठी आपण अधिकांश लोकांकडे दुर्लक्ष करु शकतो का?

प्रश्न :  देवीदेवतांच्या रूपांवर ध्यान करण्यात काही विशेष लाभ आहे का?

अम्मा :  देवाच्या साकार रूपावर ध्यान करुन मनाची एकाग्रता व मनःशुद्धी प्राप्त करु शकतो. आपण ज्या देवतेवर ध्यान करत आहोत त्या देवतेचे गुण आपल्यात विकसित होतील. मूलभूत गोष्ट अशी आहे की आपण सर्वप्रथम एकाग्रता मिळविण्यासाठी व वासनांचा समूळ नाश करण्यासाठी नेटाने प्रयत्न केला पाहिजे. उघड्या डोळ्यांनी एखाद्या बिंदूकडे पहात राहणे हासुद्धा एकाग्रता मिळविण्याचा एक चांगला अभ्यास आहे.

संपूर्ण जगभर लोक नवीन वर्षाच्या स्वागताची आणि त्याबरोबर येणा-या अनुभवांना सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. याप्रसंगी अम्मा परमात्म्याला प्रार्थना करु इच्छिते की, आमच्या हृदयांत प्रेम, करुणा ओसंडून वाहू दे, आमची हृदये ईश्वराप्रती जागरुक राहू दे, आणि आमच्या दैनंदिन व्यवहारात ते अधिकाधिक व्यक्त होऊ दे. ज्यांच्याकडे धनधान्याची विपुलता आहे, त्यांच्या मनात अन्न-वस्त्र-निवा-याचा अभाव असलेल्यांना मदत करण्याचा भाव उपजू दे.

हे परमात्मन्! मानवजात आपल्या उच्च मूल्यांपासून ढळून पशुत्वाच्या निम्नतम पातळीवर उतरण्यास कारणीभूत असलेल्या आमच्या मनातील युद्ध, संघर्ष व दहशतवादी विचारांचे पूर्णतः उच्चाटन कर. समाजाचा चांगुलपणा ज्यामुळे पोखरुन निघत आहे असा भ्रष्टाचार, खोटारडेपणा व शोषण कमी होऊ दे. लहान मुले, अपंग व दीनदुबळ्याचे रक्षण करण्याचा मनोभाव आमच्यात निर्माण कर.
वरील सर्व गोष्टींसाठी अम्मा तिच्या हृदयाच्या गाभा-यातून आर्त प्रार्थना करीत आहे. ही प्रार्थना पूर्ण व्हावी म्हणून अम्मा माझ्या सर्व लेकरांनांही माझ्याबरोबर प्रार्थना करण्याची व त्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न करण्याची विनंती करते आहे.
आजच्या या जगात एकाच घरात राहणारे दोघेजणही परस्पर प्रेम, विश्वास व शांतीने एकत्र राहू शकत नाही. सतत वाद घालणे, भांडणे व एकमेकांवर दोषारोपण करणे यातच सारे आयुष्य निघून जाते. प्रेम देणे किवा घेणे या करिता त्यांना वेळच नाहीये आणि इच्छाही नाहीये. लोक एक दुस-यांवर प्रेम करण्याऐवजी कुत्री, मांजरी व पक्षी पाळून त्यांच्यावर प्रेम करतात. जणूकाही मानव मानवाखेरीज दुस-या कशावरही प्रेम करायला तयार आहे. एवढेच नाही तर आपण आपले मोबाईल फोन, कॉम्प्युटर्स व इलेक्ट्रोनिक्स वस्तूंवरही खूप प्रेम करतो. पण एकमेकांवर प्रेम करणे व विश्वास दाखवणे मात्र आपल्याला अजूनही जमत नाही.

हे नुतन वर्ष प्रत्येकाचे हृदय प्रेम, कारुण्य, प्रकाश, सुगंध व सौन्दयाने भरुन टाको. हे साध्य होण्यासाठी प्रार्थना करुया, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया.

।। ॐ लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु ।।

अम्मांच्या संदेशाचा सारांश
(24 डिसेंबर 2010)

जेव्हा जेव्हा एखादा उत्सव व पवित्र दिवस असतो, तेव्हा अम्मा संदेश देते. तथापि, हे सर्व संदेश वेगवेगळे दिसत असले तरी वस्तुतः ते सारे एकच असतात, त्यांचे सारतत्त्व एकच असते. धर्म अनेक असले तरी, अध्यात्माचा संदेश एकच एक असतो. फक्त तो संदेश वेगवेगळ्या रीतीने सादर करण्यात येतो, इतकेच.

तो संदेश तुम्हाला एका वाक्यात सांगायचा म्हटले तर असा सांगता येईल- “स्वतःला जाणून घ्या. ” हाच तो सर्वोच्च संदेश आहे. हा संदेश फक्त आध्यात्मिक मार्गापुरताच संबंधित नाही तर आपण ज्या कोणत्या कार्यक्षेत्रात कार्य करीत असू त्या प्रत्येक क्षेत्रात जर आपल्याला अपेक्षित परिणाम हवा असेल तर आपण सर्वप्रथम आपले सामर्थ्य जाणले पाहिजे. आपले सामर्थ्य आणि आपल्या दुर्बळता हे दोन्ही आपण जाणले पाहिजे. स्वतःला जाणण्याचा हा एक स्तर आहे. तथापि स्वतःला निव्वळ मनाच्या पातळीवर समजून घेणे हे काही आत्मज्ञानाचे सर्वोच्च शिखर नाही. त्यासाठी आपल्याला अंतरात गहनतम पातळीपर्यत जाण्याची जरुरी असते.
कारण स्वतःला फक्त आत्म्याच्या स्तरावर जाणल्याने आपल्याला आपले पूर्ण सामर्थ्य व दुर्बळता कळत नाही, आणि आपण त्यांच्या पारही जाऊ शकत नाही. याउलट शास्त्रांनी आपल्याला संदेश दिला आहे- “तुम्ही दुर्बळ नाहीत, तुम्ही असमर्थ नाहीत, तर तुम्ही अमर्यादित शक्तिसामर्थ्याचा स्रोत आहात. ” हेच ते परम सत्य आहे. हे सत्य जाणून घेणे हेच जीवनाचे परम लक्ष्य आहे. ऋषिमुनी व सद्गुरु हाच एक संदेश काळाची व लोकांची गरज ओळखून वेगवेगळ्या रीतीने मानवजातीला देत आले आहेत.

हिंदू धर्माला ‘सनातन धर्म’ असेही म्हटले जाते. याचे कारण असे की तो कोणत्याही देश-काळासाठी उपयुक्त आहे. तो संपूर्ण जगाच्या उत्थानासाठी शाश्वत सत्याची शिकवण देतो. सनातन धर्म सर्वसमावेशक आहे. त्यात भौगोलिक सीमा व संकुचित मनोवृत्तींसाठी कोणतेही स्थान नाही.

‘असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्माऽमृतं गमय।’
(हे परमात्मन् मला असत्याकडून सत्याकडे, अज्ञानरूपी अंधकारातून आत्मदर्शनरूपी ज्ञानप्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा.)
‘लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु।’ (सर्व लोक सुखी होवोत.)
‘पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।’
(माझे आत्मस्वरूप पूर्ण आहे, तसेच हे व्यक्त व अव्यक्त ब्रह्मही पूर्णच आहे. त्या पूर्ण ब्रह्मात माझे आत्मस्वरूपरूपी पूर्ण ब्रह्म मिळविले किंवा वजा केले तरी अवशेष जे राहते तेही पूर्णच राहते.)

आपल्या ऋषिमुनींनी जगाला अशा प्रकारच्या उदात मंत्रांची देणगी दिली आहे. त्यांच्यात कुठेही, कोणालाही, कोणत्याही प्रकारे परपीडनाचा भाव लेशभरही पाहायला मिळत नाही. ऋषींनी त्या परम अद्वैत सत्याची अनुभूती घेतली होती.

फ्रिज वस्तूला थंड बनवितो, हीटर गरम करतो, बल्ब प्रकाश देतो, पंखा हवा देतो. परंतु या सर्व उपकरणांना कार्यप्रवण करणारा विद्युतप्रवाह तर एकच असतो. या उपकरणांचे कार्य, उपयोग, किंमत भिन्न आहे, म्हणून एकातून वाहणारा विद्युतप्रवाह दुस-यातून वाहणा-या विद्युत प्रवाहापेक्षा श्रेष्ठ वा नीच आहे असे म्हणण्यात काही अर्थ आहे का? ज्याप्रमाणे भिन्न यंत्रांतून प्रवाहित होणारा विद्युतप्रवाह एकच असतो, त्याचप्रमाणे निरनिराळ्या वस्तूंच्या बाह्य नाम-रूपात वैविध्य असूनही सर्वांमध्ये अंतस्थ चैतन्य एकच आहे. हे आंतरिक ऐक्य पाहण्याची शक्ती साधना करून प्राप्त केली पाहिजे. अनुभवसिद्ध ऋषिमुनींनी ते सत्य आपल्या अनुयायांमध्ये संचारित केले. या आत्मदर्शनानेच भारतातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनशैलीचे रूप घडविले आहे. ह्या संस्कारांच्या अनुयायांना हिंदू म्हणतात. वस्तुतः हा इतर धर्मांसारखा एक धर्म नाहीये. कारण की धर्माचा सर्वसाधारण अर्थ एखाद्या विशिष्ट व्यक्तीने स्थापन केलेला असे मानले जाते. उलटपक्षी सनातन धर्मातील हे सारे संस्कार, अनेक भिन्न मतमतांतरे, भिन्न काळात, भिन्न मार्गांनी, भिन्न दृष्टिकोन असलेल्या अनेक सत्यद्रष्ट्या ऋषींच्या अनुभवांचा समन्वय आहे. म्हणून हिंदू धर्म कोणत्याही एका व्यक्तीने स्थापन केलेला नाहीये. तसेच सनातन धर्माचे आधारभूत तत्व कोणत्याही एका धर्मग्रंथापुरते मर्यादित नाहीये. हा धर्म समग्र जीवनदर्शन आहे.

सनातन धर्म असे म्हणत नाही की, ईश्वरप्राप्तीसाठी एकच ठराविक साचेबंद मार्ग असून त्याला फक्त एका विशिष्ट नावानेच पुकारले जाऊ शकते. सनातन धर्म एखाद्या सूपर मार्केटसारखा आहे. असे काहीही नाही की जे इथे उपलब्ध नाही. महात्म्यांनी दाखविलेल्या अनेक मार्गांपैकी कोणत्याही एका इष्ट मार्गाची निवड करण्याचे किंवा स्वतःच एखादा नवीन मार्ग शोधून काढण्याचेही स्वातंत्र्य सनातन धर्मात आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्याचे किंवा न ठेवण्याचेही स्वातंत्र्य सनातन धर्म देतो.

सनातन धर्म दुःखापासून आत्यंतिक मुक्तीलाच मोक्ष म्हणतो. ते लक्ष्य प्राप्त करण्याच्या मार्गाबद्दल सनातन धर्म कोणताही हट्ट धरीत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक जडणघडणीनुसार सद्गुरू लोकांना उपदेश देतात, त्यांना मार्गदर्शन करतात.

सनातन धर्म सर्वांमध्ये दिव्यत्व पाहत असल्याने त्यात अंतहीन नरकाची कल्पनासुद्धा नाही. सनातन धर्माचे असे मत आहे की कितीही मोठा पापी असला तरी तो सद्विचार व सत्कर्मांच्या माध्यमातून स्वतःला शुद्ध करू शकतो व ईश्वरसाक्षात्कार प्राप्त करू शकतो. कितीही पापकर्मे केली असली तरी एखाद्यात खरोखर पश्चात्ताप जागला तर तो वाचू शकतो. असे कोणतेही पाप नाही की जे पश्चात्तापाने धुतले जात नाही.

ज्याप्रमाणे बिझीनेस चालविण्यासाठी बिझीनेस मॅनेजमेंट शिकण्याची आवश्यकता आहे तसेच जीवन आनंदपूर्ण बनविण्यासाठी जीवनाचे मॅनेजमेंट शिकण्याची आवश्यकता आहे. जीवनाच्या मॅनेजमेंटचे समग्र शास्त्र आहे, ‘सनातन धर्म.’