प्रश्न – “अम्मा, जेव्हा जेव्हा मला तणावाच्या परिस्थितींना तोंड द्यावे लागते त्यावेळी मला अत्यंत असहाय्य व गोंधळल्यासारखं वाटतं. या परिस्थितीत मी काय करावं असं तुम्हाला वाटतं?

अम्मा – “माझ्या मुलांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला संकटाशी, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तुमची पहिली उपजत प्रतिक्रिया असते ती त्या परिस्थितीला पाठ दाखवून पळ काढण्याची. लोकांना असं वाटतं की परिस्थितीपासून दूर गेल्यावर आपली समस्यांपासून सुटका होईल. पण हे खरं नाही. ते कदाचित थोड्या काळापुरते सुटका करून घेऊ शकत असतीलही, पण आज नाही तर उद्या, तीच समस्या पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक ताकदीने तुमच्यासमोर उभी राहते.

“तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे की बाह्य परिस्थितीत आपल्याला घायाळ करण्याचे सामर्थ्य नसते. परंतु तुमचे मन त्या परिस्थितीला वेगळ्या त-हेने चित्रित करते आणि मग तुमच्या आंतूनच दुःखाचे बुडबुडे वर उठतात. तुम्ही जेव्हा एखादी परिस्थिती चुकीच्या मार्गाने चित्रित करता तेव्हा तिचे समस्येत रूपांतर होते. मनाला बाह्य परिस्थितीचे चित्रिकरण करू न देणे, त्यावर टीप्पणी करू न देणे हे ध्येय असले पाहिजे आणि तुम्ही साक्षीभावाची कला आत्मसात केली, तरच हे शक्य आहे.

“माझ्या मुलांनो, तुमच्या समस्या बाह्य परिस्थितीत दडलेल्या नाहीत. तुम्ही बाह्य परिस्थिती टाळू शकत नाही. त्या तर जीवनाचे अभिन्न अंगच आहे. उदा. एक वयस्कर स्त्री एका सुप्रभाती एका नवविवाहित जोडप्याच्या घरी जाते. त्या स्त्रीला पाहून पतीला खूप आनंद होतो. तो आनंदाने ओरडतो, ‘अरे वा आई! तू आलीस? फारच छान! तुला पाहून मला खूपच आनंद झाला.’ परंतु त्याच्या पत्नीच्या कपाळावर मात्र आपल्या सासूला पाहून आठ्या पडतात. याचे तुम्ही कसे स्पष्टीकरण द्याल? एकच व्यक्ती दोन व्यक्तींच्या मनात एकाच वेळी दोन भिन्न प्रतिक्रिया कशी काय निर्माण करू शकते? त्या स्त्रीने घराच्या दारातून आत प्रवेश करण्यापलीकडे दुसरे काहीही केलेले नाही. ही फक्त एक साधी परिस्थिती आहे. पण एका व्यक्तीसाठी ती आनंददायी क्षण बनतो, तर दुस-यासाठी तीच परिस्थिती मोठ्या दुःखाचे कारण बनते. एका व्यक्तीसाठी ती समस्या आहे, तर दुस-यासाठी अगदीच त्याउलट. म्हणून आपले ध्येय असले पाहिजे ते मनाला बाह्य परिस्थितीत ढवळाढवळ वा टीकाटिप्प्णी करू न देण्याचे. परंतु तुमचे मन एवढे दुर्बळ व ढवळाढवळ करणारे आहे की तुम्ही अगदी सहजतेने त्या परिस्थितीचे शिकार बनून भ्रमित होता. तुम्ही त्या परिस्थितींवर नकारात्मक रीतीने प्रतिक्रिया व्यक्त करता तेव्हाच समस्या उद्भवते. दुस-या शब्दांत तुमच्या समस्येचे मूळ तुमच्यातच असते. तुमच्या समस्येचे मूळ जेथे आहे त्या मनाची अढी प्रथम दूर करा आणि मग बाह्य अढी आपोआपच सरळ होईल.

“काही विद्यार्थी अम्माकडे येऊन म्हणतात, ‘अम्मा माझे परीक्षेचे पेपर एक भयंकर समस्या होती.’ अम्मा त्यांना उलट विचारते, ‘समस्या कुठे आहे? ही समस्या तुमच्या प्रश्नपत्रिकेत शोधायची का? नाही, कारण त्याच परीक्षेत इतर अनेक जण विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. तर मग खरी समस्या तुम्ही स्वतःच आहात, कारण तुम्ही पुरेसा अभ्यास केला नव्हता. म्हणून ती परीक्षा तुमच्यासाठी समस्या असेल, परंतु जे खरोखरच चांगला अभ्यास करून परीक्षेला बसले त्यांच्यासाठी ती मुळीच समस्या नाही.’

“अनेक लोक अम्माला सांगतात की त्यांचे त्यांच्या पती वा पत्नीशी जमत नाही. परंतु तीच व्यक्ती दुस-या कुणाचा चांगला मित्र वा मैत्रिण असते, कुणाचा भाऊ वा बहिण असते, आणि त्यांच्या मुलांसाठी प्रेमळ माता, पिता असते. पांडवांसाठी श्रीकृष्ण जीवलग सखा होता, परंतु त्याच श्रीकृष्णाला कौरवांनी आपला शत्रू मानले. या उदाहरणात समस्या श्रीकृष्णात आहे का? नाही, ती समस्या कौरवांत च दडलेली होती.

“पाश्चात्य देशांत लोक बराच काळ अगोदर लग्न जमवून ठेवतात(डेटिंग), आणि जर ते परस्परांना पसंत असेल तरच पुढे लग्न करतात आणि अपत्यप्राप्ती होऊ देतात. ते काही काळ सुखाचा संसार करतात, परंतु लवकरच समस्या उद्भवू लागतात. भय आणि क्रोधावर आधारित संघर्ष सुरू होतो. त्या दोघांनाही परिस्थितीपासून सुटका करुन घेऊन पळ काढायचा असतो आणि मग त्याची परिणती घटस्फोटात होते. त्यानंतर काही काळ कडुगोड आठवणीवर दिवस कंठतात, पण ते फार काळ टिकत नाही. ते पुन्हा दुस-या कुणाशी लग्नाच्या आणाभाका घेतात आणि पूर्वीच्या त्याच अनुभवांचे दुष्टचक्र पुढे चालू राहते. हे असं कितीवेळा घडतं यावर जरा विचार करा. ते परस्परांना दूषणे देत राहातात, एकमेकांच्या चुका व दोष पुन्हा पुन्हा उगाळत राहतात. पण समस्येचं खरं मूळ आपल्यातच आहे याची मात्र त्यांना जाणीवही नसते.

“तुम्ही त्या व्यक्तीपासून काही काळ दूर पळ काढाल. आपल्या समस्येचा अंत होईल या आशेने तुम्ही एका लग्नापासून फारकत घेऊन दुसरे, तिसरे अशा उड्या मारीत राहाल, पण ते सुख फार काळ टिकत नाही. कारण तुम्हाला दुस-या व्यक्तीतही नव्या वेष्टनात, नव्या परिस्थितीत तीच दुर्बलता आणि तीच वैचारिक पातळी आढळून येते.

“कित्येकदा तर समस्या पहिल्यापेक्षाही अधिक भीषण स्वरूपात समोर येतात. व्यक्तीचे बाह्य रूप, रंग किवा चेहरामोहरा बदललेला असतो पण त्या वेष्टनातील समजून घेण्याची वैचारिक पातळी मात्र तीच असते. कारण तुम्ही आंतरिक दृष्ट्या बदललेले नसता. म्हणून तुम्ही नव्याने पसंत केलेल्या जोडीदाराचा चेतनेचा स्तर पूर्वीचाच राहतो. फक्त बाह्य रूपरंगात तेवढा बदल होतो.
“जोपर्यंत तुमच्या चेतनेच्या स्तरात आणि पर्यायाने तुमच्या मनोभावात प्रकर्षाने जाणवण्याइतपत बदल होत नाही, तोपर्यंत तुमच्या समस्या दूर होणार नाहीत. तुम्ही कुठेही गेलात तरी त्या तुमच्या जीवनात डोकावून तुम्हाला निरंतर त्रस्त करीतच राहतील. तुमचे मन भविष्याची खोटी आशा दाखवून जीवनातील प्राप्त परिस्थितीपासून दूर पळण्याचे आपले पूर्वीचेच तंत्र सांगत राहील.

“समस्या या बाह्य परिस्थितीशी निगडीत आहेत, हा गैरसमजच एकदा तुम्ही तुमच्या मनातून समूळ काढून टाकला की तुमच्या साःया समस्या कायमस्वरूपी नष्ट होतील. समजून घ्या की समस्यांचे मूळ तुमच्या स्वतःच्याच मनामध्ये आहे. एकदा तुम्हाला त्याची जाणीव झाली की मग तुम्ही तुमची आंतरिक दुर्बलता दूर करण्याची प्रक्रिया सुरू करू शकता. हे ध्येय साध्य करण्यासाठी ध्यानाचा अवलंब केला जातो. ध्यानातून तुम्हाला जे आंतरिक मौन, निस्तब्धता व तणावमुक्तता मिळेल केवळ त्याचीच तुम्हाला याकामी मदत होईल.” ॐ